Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा थेट इशारा : वादग्रस्त वक्तव्यांवरून गोगावलेंसह आमदार-मंत्र्यांना कानपिचक्या, ‘तुमचा एक चुकीचा शब्द…’

Eknath Shinde | मुंबई – आपल्या पक्षातील नेत्यांनी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे महायुतीत निर्माण झालेल्या तणावावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पवित्रा घेतला आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी मंत्री भरत गोगावले यांना चांगलंच फटकारलं आणि यासोबतच इतर आमदार आणि मंत्र्यांनाही ‘सावध रहा’ असा स्पष्ट इशारा दिला. “तुमचा एक चुकीचा शब्द, संपूर्ण युतीत मिठाचा खडा टाकू शकतो,” असे ते यावेळी म्हणाले.

अलीकडेच, शिवसेना (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले यांनी भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे मोठा राजकीय गोंधळ उडाला होता. त्यांच्या या विधानानंतर सिंधुदुर्गसह राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. नारायण राणेंना लक्ष्य करत गोगावले यांनी काही कठोर शब्द वापरले होते, ज्यामुळे भाजपने थेट “माफी मागा, अन्यथा महायुतीत चर्चा करण्याची गरजच नाही” असा इशारा दिला.

हे प्रकरण एवढं वाढलं की, महायुतीतील एकजूट धोक्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. याची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी गोगावलेंना समज दिली आणि पक्षातील सर्व नेत्यांना सार्वजनिक बोलताना जबाबदारीने वागा, असा संदेश दिला.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर अभिनंदन, जातीय जनगणनेच्या निर्णयाचं समर्थन, मराठी अस्मिता जपण्यासंबंधी ठराव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुखपदी नियुक्त करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

मात्र, यावेळी शिंदेंनी पदाविषयी अत्यंत साधेपणाने भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केलं की, “आपल्याला कोणतं पद द्यायचं, यावर पदाधिकाऱ्यांचं एकमत नाही. तोपर्यंत मला कोणतंच पद नको. मी कार्यकर्ता आहे आणि तुमचा लाडका भाऊ हेच माझं सर्वात मोठं पद आहे. मी त्यातच खूश आहे.”

शिवाय, “सध्या काही जण शिवसेनेचे ‘पक्षप्रमुख’ म्हणतात, काही ‘राष्ट्रीयप्रमुख’. त्यामुळे ,आधी तुम्ही एक नक्की करा. त्यानंतर निर्णय घ्या,” असंही ते मिश्किलपणे म्हणाले.

या बैठकीत शिंदे यांनी पक्षात वाढत चाललेली वक्तव्यांची अराजकता रोखण्यावर भर दिला. “राजकीय सहयोग आणि सत्तेच्या गाठीभेटी टिकवून ठेवायच्या असतील तर जबाबदारीने बोलणं आवश्यक आहे. कोणतंही वक्तव्य केलं की त्याचे पडसाद फक्त पक्षापुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण युतीवर परिणाम होतो,” असं ते म्हणाले.

त्यांनी यावेळी उपस्थित आमदार व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट बजावलं की, “तुमचं एक वाक्य संपूर्ण युतीमध्ये फूट पाडू शकतं. त्यामुळे ज्या पदावर तुम्ही आहात, त्याचं भान ठेवा. सार्वजनिक ठिकाणी बोलताना विशेष सावधगिरी बाळगा.”

एकनाथ शिंदे यांच्या या भाषणातून स्पष्ट संकेत मिळतो की, ते महायुतीतील संबंध अधिक दृढ ठेवण्याच्या भूमिकेत आहेत. सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षाने संयम आणि शिस्त यांचे पालन केल्याशिवाय युती टिकणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या वक्तव्यातून राजकीय परिपक्वतेची झलक दिसून आली.

शिवाय, शिंदे यांनी कार्यकारिणीतून मिळालेल्या पक्षप्रमुखपदाच्या ठरावावर स्वतःहून नम्र नकार देत कार्यकर्त्यांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिंदेंचं नेतृत्व हे एकहाती नाही तर सामूहिक निर्णयावर आधारलेलं असल्याचा संदेश त्यांनी दिला.

Leave a Comment